5-जी तंत्रज्ञानामुळे ‘स्मार्ट सिटी’ अधिक हायटेक होणार

Aditya.Tanawade@timesggroup.com @AdityaMT पुणे : देशात येऊ घातलेल्या 5-जी तंत्रज्ञानामुळे वेगाने विकसित होत असलेल्या ‘स्मार्ट सिटी’ अधिक हायटेक होणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारलेले प्रकल्प प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली असून, देशभरातील विविध शैक्षणिक संस्था आणि आयटी कंपन्यांमध्ये संशोधन सुरू करण्यात आले आहे. 5-जी तंत्रज्ञानाचा प्रकल्पांना फायदा होणार असून, यामुळे शहरातील पायाभूत सुविधांवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचे दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यात घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, सार्वजनिक वाहतूक, नागरिकांना मिळणाऱ्या ऑनलाइन सुविधा अशा अनेक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या सर्व सुविधांचा वापर 5-जी तंत्रज्ञानाच्या साह्याने करता येणे अधिक सुलभ होणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक सर्वांसाठीच डोकेदुखी ठरली आहे. शहरात उपलब्ध असलेले ‘पीएमपीएमएल’चे बस थांबे 5-जीच्या साह्याने अधिक स्मार्ट करता येऊ शकतात. प्रायोगिक तत्त्वावर, असे प्रकल्प राबवायला सुरुवातही झाली आहे. त्यात 5-जीची भर पडली, तर सार्वजनिक वाहतूकीची व्यवस्था अधिक हायटेक होऊन नागरिकांना बसचे मार्ग, वेळा; शिवाय थांबे, बसचे जीपीएस ट्रॅकिंग अशा अनेक गोष्टी या तंत्रज्ञानाच्या साह्याने शक्य होऊ शकणार आहेत. पीएमपीसह मेट्रोतही असेच बदल होतील, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. शहरात ट्रॅफिक नियंत्रणासाठी उभारण्यात आलेल्या सिग्नल व्यवस्थेतही बदल होणार असून, रहदारी असलेल्या चौकांमध्ये या सिग्नल पद्धतीचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकणार आहे. सार्वजनिक वाहतुकीसह पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, ऑनलाइन सुविधा, नागरी सुरक्षा यातही 5-जी तंत्रज्ञान उपयोगी पडणार असून, त्यावरील संशोधनास सुरुवात झाली आहे. चीन, अमेरिका यांसारख्या देशांत प्रत्येक रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेले कॅमेरे आणि त्याद्वारे ठेवले जाणारे नियंत्रण यावर या तंत्रज्ञानाच्या साह्याने भर देता येणार असून, ‘स्मार्ट पोलिसिंग’ही शक्य असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा आणखी एक फायदा म्हणजे संपूर्ण शहरात ‘वायफाय हॉटस्पॉट’चे जाळे निर्माण करून कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देता येणार आहे. नागरिकांना हवा तेवढा डेटा वायफायद्वारे वापरता येणे शक्य असून, कुणालाही शहराच्या कोणत्याही भागात बसून काम करता येऊ शकते, अशी व्यवस्था यातून निर्माण होईल. 5-जी मुळे असा होणार स्मार्ट सिटीचा विकास १. सार्वजनिक वाहतुकीवर सकारात्मक परिणाम २. ट्रॅफिक नियंत्रणासाठी ‘5-जी’चा वापर शक्य. ३. पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती. ४. संपूर्ण शहरात वायफायचे जाळे विणले जाणार. ५. सुरक्षेच्या दृष्टीने ‘सीसीटीव्ही’चा प्रभावी वापर. 5-जी तंत्रज्ञानाचा स्मार्ट सिटीवर चांगला परिणाम होईल. त्यातून काही समस्या निर्माण होतील; पण त्या सोडवता येणे शक्य आहे. नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर याचा चांगला परिणाम होईल. शहरात सर्वांना रस्त्यावरही मोफत इंटरनेट मिळू शकेल. पोलिसांनाही सुरक्षेच्या दृष्टीने ‘सीसीटीव्ही’मार्फत नियंत्रण ठेवणे अधिक सुकर होणार आहे. - ओंकार गंधे, सायबर तज्ज्ञ


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39rtQs8

Comments

clue frame