क्षेपणास्त्रे

प्रा. वसंतराव काळे ही भारताच्या लष्करी सामर्थ्यातील महत्त्वाची आयुधे आहेत. गेल्या काही वर्षांत भारताने क्षेपणास्त्र विकासात मोठी मजल मारली आहे. या क्षेपणास्त्रांची ओळख... अवकाश संशोधन क्षेत्रातील लष्करी कामासाठी उपयोगी पडणारा घटक कोणता असेल तर तो म्हणजे क्षेपणास्त्र. क्षेपणास्त्र म्हणजेच प्रक्षेपणास्त्र. क्षेपणास्त्राविषयी जनमानसात नेहमीच मोठे कुतूहल आढळते. फेकून मारायची वस्तू किंवा अस्त्र अशी क्षेपणास्त्राची सोपी व सुटसुटीत व्याख्या करता येईल. लष्करी कामासाठी उपयोगी पडणारी, अग्निबाण अशी शास्त्रीय भाषेतील क्षेपणास्त्राची दुसरी एक व्याख्या बनू शकते. रासायनिक, जैवरासायनिक किंवा अण्वस्त्रांचे (अणुबॉम्ब, हैड्रोजन बॉम्ब इत्यादी) वहन करून, इच्छित लक्ष्यावर, त्यांचा भडीमार करू शकणाऱ्या अग्निबाणाला क्षेपणास्त्र म्हणून संबोधता येईल. क्षेपणास्त्राचे वर्गीकरण अनेक प्रकारे होऊ शकते. पहिल्या प्रकारात टॅक्टि्कल आणि स्ट्रॅटेजिक अशा दोन गटांत त्यांची विभागणी करता येते. टॅक्टि्कल म्हणजे लढाई जिंकण्यासाठी प्रत्यक्ष रणभूमीवर वापरावयाचे अस्त्र. जी क्षेपणास्त्रे शत्रूच्या मनोधैर्याच्या खच्चीकरणासाठी वापरली जातात, त्यांचा स्ट्रॅटे्जिक प्रकारच्या गटात समावेश करता येईल. दुसऱ्या प्रकारानुसार, क्षेपणास्त्रांची गटवारी, क्षेपणास्त्रे कोठून कोठे फेकायची यावरून केली जाते. जमिनीवरून किंवा एका सागरपृष्ठावरून दुसऱ्या जमिनीवर किंवा दुसऱ्या सागरपृष्ठावर; जमिनीवरून आकाशात; आकाशातून जमिनीवर व सागर पृष्ठावरून आणि आकाशातून आकाशात मुसंडी मारणारी असे ते अनेक गट पडतात. क्षेपणास्त्रांची वर्गवारी त्यांचा पल्ला तसेच अंतरावरून करणेही शक्य होते. सुमारे ५०० किलोमीटर अंतर कापणारी लघू पल्ल्याची ५०० ते ५५०० किलोमीटर अंतर कापणारी मध्यम पल्ल्याची आणि ५५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापणारी दीर्घ पल्ल्याची अशा तीन गटांत होऊ शकेल. दीर्घ पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांना आंतरखंडीय क्षेपणास्त्रे म्हणतात. आगामी युद्धे ही बंदुका, तोफांनी तर ती अण्वस्त्रांनी आणि क्षेपणास्त्रांनी जमिनीवरून किंवा अथांग आकाशातून लढली जातील. तोफा आणि बंदुका यांच्या तुलनेत क्षेपणास्त्रे कितीतरी पटीने अधिक सरस व अधिक विनाशकारी ठरतात. प्रचंड गती, अचूक वेध, प्रतिबंधात्मक उपाय केवळ आणि केवळ अशक्य, त्याचबरोबर विविध प्रकारची स्फोटके आणि अस्त्रे, मोठ्या प्रमाणात वाहून नेण्याची त्यांची कमालीची क्षमता ही यामागची काही कारणे होत. ‘पृथ्वी’ हे आपल्या देशाने विकसित केलेले ५० ते २५० किलोमीटर अंतर कापणारे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आणि ‘अग्नि’ हे सुमारे पाच हजार किलोमीटर अंतराचा पल्ला गाठणारे सामर्थ्यशाली क्षेपणास्त्र! ‘त्रिशूल’ आणि ‘आकाश’ ही जमिनीवरुन आकाशात मुसंडी मारणारी, भारताची दोन क्षेपणास्त्रे, ‘त्रिशूल’चा पल्ला नऊ किलोमीटर तर आकाशची पल्लाक्षमता २५ किलोमीटर. ‘आकाश’ एका उड्डाणात ४ ते ५ अस्त्रे फेकू शकते. ‘ब्राह्मोस’ हे भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले क्रूझ क्षेपणास्त्र. २०० ते ३०० किलोग्रॅम वजनाची स्फोटके वाहून नेण्याची त्याची क्षमता! लढाऊ जहाज, विमाने अथवा हवेतूनही ब्राह्मोसचा मारा करता येतो. नाग, इंटरसेप्टर, प्रहार, धनुष्य, अस्त्र, पिनाक ही भारताने विकसित केलेली अन्य क्षेपणास्त्रे. ‘नाग’ चार किलोमीटर अंतर कापून रणगाड्याचा भेद करू शकते. ‘धनुष्य’चे, युद्धनौकेवरून प्रक्षेपण करता येते. भारतातील महानगरांच्या सुरक्षिततेसाठी हैदराबादच्या संरक्षण संशोधन आणि विकास (डीआरडीओ) या संस्थेने ‘अस्त्र’ नामक आणखी एक क्षेपणास्त्र विकसित केले आहे. भारताने विकसित केलेल्या या सर्व क्षेपणास्त्रांच्या अनेक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. यापैकी बरीच क्षेपणास्त्रे यापूर्वीच देशाच्या लष्करी ताफ्यात सामील झाली आहेत. उर्वरित काही नजीकच्या भविष्यकाळात देशाच्या लष्करी ताफ्यात सामील होतील. ही सर्व क्षेपणास्त्रे आपल्या देशाचे लष्करी सामर्थ्य कितीतरी अधिक पटीने वाढवतील, यात तीळमात्र शंका नाही.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GvXOwr

Comments

clue frame